Monday, August 22, 2016

सावली !!!

सावली !!!

राजकारण,समाजकारण ,कला, क्रीडा असो की साहित्य  या क्षेत्रातील दिगज्जांचे सामान्यांना नेहमीच आकर्षण असते, हे लोक राहतात कसे ? बोलतात कसे ? वागतात कसे या सा-यां बद्दल एक कुतुहूल असते, या लोकांना भेटावे, बोलावे असे नेहमी वाटत असते, त्यांचा सहवास लाभावा असे वाटत असते. असाच एका मोठ्या राजकारणी व्यक्तीचा सहवास लाभलेला मी एक भाग्यवंत ! हे व्यक्तिमत्व म्हणजे माझे साहेब...वयाने तरुण असले तरी कर्तृत्वाने लहान वयातच मोठे झालेले एक तडफदार नेतृत्व !!! 15 वर्षांपूर्वी नौकरीच्या निमित्ताने त्यांच्या जवळ आलो आणि बघता बघता त्यांची सावली बनून गेलो. आज त्यांच्याशी असलेले हे नाते साहेब आणि कर्मचारी असे नव्हे तर एका जेष्ठ बंधूप्रमाणे झाले आहे.  24 तास सोबत राहणारा एक pa म्हणून त्यांच्या प्रत्येक सुख, दुःखाचा सर्वात जवळचा एक साक्षीदार !  त्यांच्या सोबत काम करतांना अनेक गोष्टी जवळून पाहायला मिळाल्या, अनुभवायला मिळाल्या.  त्यांचा संघर्ष, त्यांचे नेतृत्व ,त्यांची सामान्यांच्या कामाप्रति असलेली तळमळ, जनतेशी असलेली आपुलकी, सहका-यांशी असलेला स्नेह, स्वभातील विनम्रता आणि सहनशीलता ! 'जया अंगी मोठेपण तया यातना कठीण' याचा सर्वात मोठा अनुभव साहेबां सोबत काम करताना येतो, 'आम्हा घरी रोज नित्य युद्धाचा प्रसंग' या प्रमाणे रोज येणा-या नव नवीन प्रसंगांना ते धीराने तोंड देत असतात,सामान्यांसाठी झटत असतात ! म्हणूनच ते माझ्यासाठी आहेत आयडॉल ,आवडते हिरो अन एक आदर्श !! वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला या लाडक्या नेत्याला खूप खूप शुभेच्छा !!!!💐💐💐🎂🎂🎂





Tuesday, June 14, 2016

आठवण शाळेतल्या पहिल्या दिवसाची....

*आठवण शाळेतल्या पहिल्या दिवसाची*


                   काल शाळेचा पहिला दिवस म्हणून श्रेयसला सोडण्यास गेलो. पहिलाच दिवस असल्याने शाळेच्या आवारात सर्वच मुलांचे पालक आपापल्या  मुलांना सोडण्यास आलेली , त्यांच्या 2 व्हिलर पासून ते मोठं मोठ्या गाड्यांची पार्किंग मध्ये हि गर्दी कि बस....काही पालक जोडीने आलेले....
                   सर्व मुले नीटनेटकी युनिफॉर्म मध्ये, पायात सॉक्स आज शूज, पाठीवर schoolbag चे ओझे, आत टिफीन अन पाण्याची waterbag.... प्रत्येक मुलगा असो वा मुलगी गोड, चुणचुणीत अन स्मार्ट ...प्रत्येकात त्या वयातही एक कॉन्फिडन्स... बिनधास्त पणे ती वावरत होती, बोलत होती... हिंदी , इंग्लिश मध्ये सफाईदार पणे बोलणा-या मूलांच्या या गप्पात विषय होते ..... कल कि इंडिया- झिमबॉम्बे match देखि क्या, तू कोनसे समर कॅम्प गया था, हम टूर पे गये थे, मैंने छुटीयो में ये गेम सिखा या नया ले लीया... सर्व चर्चा अशाच...._
                 त्यांच्याकडे पहात पहात मला शाळेतला दिवस डोळ्यासमोरून आठवू लागला..... घराच्या सर्वात जी जवळची शाळा असेल ती आमची शाळा असायची...मग ती जि. प.ची असो कि खाजगी.. शाळा जवळ म्हंटले कि कोणी सोडायला येणे अथवा स्कूल बॅग हा प्रकारच नाही. शाळेतला पहिला दिवस.... अर्धीच मुलं आलेली... शिक्षक हि मुलेच नाहीत म्हणून एकदा वर्गात चक्कर मारून बाकी सह शिक्षका सोबत गप्पात रंगलेली.... आहे तो ड्रेस घालून आलेली मुलं... कारण युनिफॉर्म फक्त 15 ऑगस्ट, 26 जानेवारीच्या आसपास दिसायचा...अन इतर वेळी त्याची सक्तीही तशी नसायची... घर जवळ म्हणून टीफिनचा विषय नसायचा... मधली सुट्टी झाली घरी पळायचं.... स्कूल बॅग म्हणजे घरातली पिशवी... नाहीतर पावसात भिजू नये म्हणून carry बॅग ची केलेली स्कूल बॅग.... काहींच्या हातात तशीच मोकळी वह्या , पुस्तके !  काही अनवाणी पायांनी आलेली तर बहुतांश मुलांच्या पायात स्लीपर नाहीतर थोडी बरी चप्पल... शूज अभावानेच एखाद्याच्याच पायात  !!  पहिल्या दिवशी धडपड असायची ती जागा धरायची, कारण पुढे वर्षभर तीच जागा ठरलेली असायची !! पहिल्या दिवशी तर सोडा 8 दिवस पुस्तके अन वह्या नसायची!!! मागच्या वर्षीच्या को-या पानातून केलेली एक रफ वही !! मागच्या वर्षीची पुस्तके अर्ध्या किमतीत विकून स्वतः साठीही वरच्या वर्गातील कोणाची तरी अर्ध्या किमतीत घेतलेली पुस्तके... ज्याच्या कडे गाईड तो वर्गातला सर्वात श्रीमंत मुलगा.... शाळेतला हौद हीच वॉटरबॅग... पहिल्या दिवशी चर्चा असायची तू मामाच्या गावाला काय केलं.... मी किती कोया , गोट्या जमा केल्या न तू किती केल्या.... वर्गात आलेली नवीन मूल बुजून गेलेली तर जुनी मुलं टवाल्या करणारी ...
अस होत आमचं बालपण... असा असायचा आमचा शाळेतला पहिला दिवस...
© *प्रशांतजोशी*दि 12 जून 2016



Sunday, June 5, 2016

दहावीचा निकाल आणि आठवण.

दहावीचा निकाल आणि आठवण.....
उद्या सोमवारी दहावीचा निकाल. आमच्या वेळी दहावीच्या  निकालाची तारीख जाहीर झाल्यापासूनच निकालाच्या धास्तीने पोटात गोळा यायचा...कारण त्यावेळी आजच्या सारखा 85%, 90% , 95% निकाल नाही लागायचा तर 40 ते 65 % निकालाची परंपरा होती. दहावी म्हटले कि हमखास इंग्रजी आणि गणित या विषयात बहुतांश मुले नापास व्हायची, या नापासा पैकी फारच थोडी मुले शिकून पुढे जायची ! गल्लीतला एखादा मुलगा 40-45 % मार्क घेऊन पास झाला तरी हिरो ठरायचा ! आमच्या घरातल्या आमच्या 6 भाऊ- बहिणी पैकी माझ्या पेक्षा मोठी चौघे गणित आणि इंग्लिश या विषयात नापास झालेली. मी लहानपणा पासून तसा बरा हुशार असल्याने नापासाची भीती नव्हती, तरीही पोटात गोळा मात्र कायम होता, निकालाचा दिवस उजाडला अन मी 
75% मार्क घेऊन पास झालो. घरातच नाही नाही तर गल्लीतही इतके मार्क घेऊन पास होणारा मी पहिलाच ! वर्गातही तिसरा नंबर होता... आकाश ठेंगणे झाले होते. आजची मुले 95 , 96 आणि 99% मार्क घेतल्यावर ही नाराज झालेली जेंव्हा दिसतात तेंव्हा आपल्या त्या 75% मार्कांला किती किंमत होती असा प्रश्न पडतो. पण तो दहावीच्या निकालाचा थ्रिल मात्र काही वेगळाच !!

तुमच्या आहेत का अशा काही  दहावीच्या आठवणी ???


मंत्रालयातील आगीचा थरार

साधारण 3 वर्षापुर्वीची ही गोष्ट !!
 22 जून 2012 , वेळ दुपारी 2 च्या आसपासची . मुंबईतल्या आमदार निवासच्या आकाशवाणी कैंटीन मध्ये जेवण आटोपले आणि नेहमी प्रमाणे मंत्रालयात कामासाठी निघालो. त्या दिवशी जेवण ज़रा जास्तच झाले होते, वर लस्सी घेतल्याने थोड़ा आळसही आला होता, संध्याकाळी गावी परतायचे होते, मंत्रालयात जावू का रूम वर जावून वामकुक्षी घ्यावी या विचारात असतानाच पाय नकळत मंत्रालयात कड़े वळले. नीघालोच आहोत आणि पुन्हा 8 दिवस येणे होणार नाही आजच कामे करून घेवूत  या विचाराने आत गेलो, जेवणा नंतरचा आळस जावा आणि शत पावली घडावी म्हणून लिफ्ट ने न जाता तड़क पाय-याने 6 वा मजला चालत चालता गाठला, तिथली थोड़ी फार कामे आटोपुन चौथ्या मजल्यावर आणि पुन्हा एक काम आठवले म्हणून पाचवा मजल्यावर गेलो. या मजल्यावर आमच्या जिल्ह्यातील एका मंत्र्याचे ऑफिस.  म्हणून हे ऑफिस हा ज़रा हक्काचे वाटायचे. आत गेलो आणि चव्हाण नावाच्या तेथील pa मित्राकडे बसलो. घड्याळाचा काटा तो पर्यंत 2.40 वर सरकला होता.

अचानक , चौथ्या मजल्यावर आग लागली अशी चर्चा सुरु झाली , शॉर्ट सर्किट झाले असेल असे समजुन त्याकडे दुर्लक्ष केले , पण काही क्षणात आम्ही बसलो तिथे थोडासा धुर येवू लागला .... धावपळ सुरु झाली...सुरक्षेचा उपाय म्हणून आत मधील कॅबिन मध्ये गेलो, तिथे ही धुर आमचा पाटलाग करीत आला, एका मिनिटांत ती खोली धुरांने भरून गेली, धावपळ, पळापळ,  आरडा - ओरड सुरु झाली,
नाकातोंडात धूर जाऊ लागल्याने ठसका येऊ लागला,डोळे चूरचूरायला लागले होते.बाहेर जाण्याशिवाय पर्याय नव्हता,बाहेर जाण्यासाठी कॅबीन चा दरवाजा उघडताच धुराचा प्रचंड मोठा लोट अंगावर आला,संपूर्ण पॅसेज काळ्याकुट्ट धूराने व्यापून गेला होता, दोन पावलांवरचे ही काही दिसत नव्हते, मंञालय तसेच पायाखालचे !!  डोळ्याला पट्टी बांधली तरी कुठूनही आणि कसेही जाता येईल इतक्या ओळखीचे होते. त्यामुळे तसाच त्या अंधारातही भिंतीचा आसरा घेऊन डोळे घट्ट मिटून बाहेर पडण्याचा प्रयत्न सुरू केला,  माञ अंधारात आपण चालू शकू पण नाकातोंडात जाणार्‍या धुरामुळे काही क्षणात बेशुद्ध होऊ याचीही जाणीव झाली. त्या क्षणाला  Sixth Sense जागा झाला आणि थांबलो! विचार केला  की ज्या खोलीत आपण थांबलो ती मंञालयाच्या आतील भागात उघडत होती तर अगदी चार पावलांवर त्याच्या समोरच्या बाजूला असलेली मंञ्यांची केबीन मंञालयाच्या बाहेर दर्शनीय भागात उघडणारी होती. त्यामुळे खाली न जाता समोरच्या केबीनमधे जाण्याचा निर्णय घेतला.एकमेंकाच्या हाताची साथ घेऊन समोरची केबीन गाठली. ते मंञ्यांचे दालन असल्याने हवाबंद आणि  थोडेसे सुरक्षीत असल्याने त्या कक्षात आणखी धूराचे लोट पोहचले नव्हते. त्यामूळे तिथे थोडासा धीर आला,हा थोडासा समाधानाचा क्षणही क्षणभरच टिकला, ती केबीन ही धूराने पाहता-पाहता गच्च भरली. 
फटाक्याची माळ पेटत-पेटत जावी त्याप्रमाणे रूममधील एक एक  वस्तू पेट घेत होती,खिडकीला लागून असलेल्या पाईपला धरून चौथ्या मजल्यावर जाणे शक्य होते.. सिंमेटचा पाईप तो बाहेरची गरमी आणि आगीच्या झळांमूळे तो ही तापला होता.एकीकडे पाईपला हात लावताच बसणारे चटके,खाली न जावे तर आतमधे उभा टाकलेले मरण आणि गरम पाईपला धरून खाली उतरताना तोल जाऊन पाचव्या मजल्यावरून खाली पडण्याची आणि पर्यायाने मरणाच्या च्या जवळ जाण्याचीच तिसरी शक्यता.. चोहूबाजूंनी मृत्यु  दिसत होता.कूठला तरी पर्याय निवडणे भाग होते. पाईपला धरून खाली उतरणे हा तसा थोडासा सोपा पर्याय निवडला,पाचव्या वरून चौथ्या मजल्यावर आलो.खिडकीच्या सज्जाचा भक्कम आधार मिळाला.एका छोट्याश्या सज्जावर 35-40 जणांची गर्दी, खाली बघ्यांची नुसतीच गर्दी आणी आरडाओरड . मदत करण्याची इच्छा असूनही ते सर्व हतबल होते.

दुसरीकडे समोर मृत्यु उभा असतानाही अंगातला पञकारीतेचा गुण जात नव्हता. मोबाईलद्वारे फोन करून काही वाहीन्यांच्या पञकार मिञांना घटनेची माहिती दिली.टिव्हीवर ब्रेंकींग न्यूज सुरू झाल्या.काही वाहीन्यांवर माझ्या नावाची पट्टी आणी मी अडकल्याची पट्टी झळकू लागली.आणि एका वाहिनीने तर चक्क फोनवरून लाईव्ह प्रतिक्रीया घेताना एकीकडे धीर देत त्याच्या स्टाईलमधे 'आता नेमकं तिथे कस वाटतंय ? काय अनुभवता आहात असे ? पराकोटीचे प्रश्न ही विचारले..
 पुढचा प्रसंग काय येणार हे माहीत नव्हते.घरी एकदा बोलून घ्यावे या विचाराने सौ. ला फोन केला तर त्या वामकुक्षीच्या अधीन गेलेल्या, बोलणे काही झालेच नाही. साडेतीन वर्षापूर्वीही सोशल मिडीयाचा तेवढाच नाद !! या जिवघेण्या प्रसंगातही मंञालयाला आग पाचव्या मजल्यावर अडकलो, felling घाबरलेला !!! अशी पोस्ट टाकून मोकळा झालो.. चौथ्या मजल्यावरून खाली जाण्यासाठी आता पाईप ही नव्हता.खाली कसे जावे ? हा प्रश्न होता. पाठीमागे मंञालय धडधडा जळताना दिसत होते,तिथे कुठल्याही क्षणी खिडकीतून आग आमच्यापर्यंत पोहचणार होती.सर्वांनी आपले शर्ट काढून त्याची दोरी बनवून त्या द्वारे खाली उतरण्याचा विचार सुरू केला. या पर्यायातही  मृत्युचाच धोका होता. दरम्यानच्या काळात टिव्हीवरील बातमी आणी फेसबूकवरील स्टेटस पाहून मिञाचे,नातेवाईंकाचे आणि परिचितांचे फोन यायला सुरवात झाली. प्रतिक्रियेसाठी आता हिंदी,इंग्रजी वाहीन्यांचे फोन येणे सुरू झाले होते. एकीकडे जिव कसा वाचवावा हा प्रश्न ??  दूसरीकडे हा फोनचा वैताग !
खालून कूठलीही मदत येताना दिसत नसल्याने संयम सुटत चालला होता. सज्जावर सोबत असणा-या दोन तिन महीला कर्मचा-यांचे  वेळापासून रडणे सुरू झाले होते. गोंधळातून त्याचे रडणे कानावर पडले की आमच्याही जिवाची घालमेल सुरू व्हायची. दोन क्षणासाठी डोळे बंद केले आणी भिंतीच्या आधाराने डोके टेकवले तोच आणखी एक शाॅक बसला. एवढ्या गर्मीतही कपाळावर थंड थेंब पडत असल्याची जाणीव झाली आणि दोन सेंकदाची तंद्री ही हरवली. थेंब कोठून येत आहेत म्हणून वर पाहीले आणि इतका वेळ धीर धरून ठेवलेले हातपाय आता गळायला लागले होते. सहाव्या मजल्यावरील खिडकीतून खाली न येता आल्याने आणि धूराच्या ञास ने बेशुद्ध आणि  गतप्राण झालेल्या एका माणसाच्या तोंडातल्या  फेसाचे ते थंड थेंब होते. क्षणभर काहीच सुचले नाही. आता सर्व संपले याची खाञी पटू लागली.. गरम झालेल्या खिडकीचा सज्जाही कुठल्याही क्षणी आम्हाला घेऊन खाली कोसळणार होता. काय करावे सुचत नसतानाच पुन्हा एक अंधूक आशा दिसली. फायर ब्रिगेडचे लोक त्याच्यांकडील उंच शिडी घेऊन आमच्यापर्यंत पोहचत होते. थोडासा धीर आला.
 त्या शिडीने सज्जावर अडकलेली माणसे खाली घेऊन जाऊ लागली. एका वेळी त्या शिडीत चार लोक बसायचे, फायर ब्रिगेडच्या नियमाप्रमाणे सर्वात आधी लहान मुले-महीला नंतर वयोवृद्ध नागरिक आणि  सर्वात शेवटी आमच्या सारखी तरूण मंडळी असा क्रम ठरला होता. माझा नंबर जवळपास शेवटच्या फेरीतच आला. सज्जावरून शिडीत जाताना उडी मारावी लागायची ही उडी मारतानाही तोल जाऊन कोसळण्याची भिती म्हणजे आणखीही मृत्युचा  पाठलाग संपला नव्हता. अखेर जवळपास संपुष्ठात येवू लगलेला जिव तसाच मुठीत घेऊन देवाचे नाव घेत शिडीत उडी मारली आणी सुखरूप खाली पोहचलो.. .. खाली येताच पञकार मिञांनी धीर देण्याचा प्रयत्न केला. कॅमेराचे फ्लॅश आणि  लखलखाट धूराने काळा झालेला चेहरा अधिकच गडद करून दाखवीत होता.गरम झालेले डोके शांत करण्यासाठी चार बाटल्या डोक्यावर ओतूनही ते शांत होत नव्हते. मिञाच्यां साहाय्याने तसाच अर्धा तास शांत बसून होतो. .. 58 मिनीटांचा मृत्यूचा अनुभवलेला थरार संपला होता..........पण त्या 58 मिनिटांची स्मृति कायमची राहिली होती.
( अडिच वर्षापूर्वी मंत्रालय आगीत अनुभवलेला सत्य प्रसंग ) 
या घटनेनंतर घरी परत जाताना एक विचार करू लागलो आपण दूपारी मंञालयात गेलो नसतो तर या प्रसंगातून वाचलो नसतो का ? हा विचार आला आणि मी कसा वाचलो याचाही विचार करू लागलो.. मि ज्या कामासाठी कंटाळा न करता मंञालयात गेलो त्या कामामध्ये दोन कामे ही गरीब कॅन्सर पिडीतांना मदत मिळवून देण्याची होती. ही कामे त्याच दिवशी माझ्या जाण्यामुळे मार्गी लागली होती. कदाचित त्या गरीब रूग्णांसाठी मी केलेली छोटीसी मदत त्याच्यां सदिच्छा यामुळेच मी यातून वाचू शकलो..

वाडा ते घर

वाडा ते घर .....

गणेशपार म्हणजे परळी शहरातील जूना भाग. याच भागातील आमचा चिरेबंदी वाडा...त्याला किल्ल्या सारखे मोठे सागवान लाकडाचा दरवाजा...हा दरवाजा बंद करतांना कड़ी सोबत एक आगळ असायची. ( आगळ म्हणजे भिंतिच्या दोन्ही बाजूला एक चौकोन त्यात एक चौकोणी जाड लाकुड लावायचे ) ही आगळ लावणे सोपे पण काढ़णे खुप अवघड. पण त्यामुळे 100% सुरक्षेची खात्री. 
दरवाजा मधून आत गेल की नजरेत भरायच् मोठ आंगन अन् समोर 18 खनाचे माळवदी घर... या 16 खनात 4-4 खनाच्या 4 खोल्या ....या खोल्या म्हणजे एक स्वयंपाक घर ज्यात चुलीवर स्वयंपाक व्हायचा ...दूसरी खोली म्हणजे कोठी (आजची स्टोर रूम ) तर समोर 8 खणाची ओसरी ( आजचा शब्द म्हणजे हॉल ) राहिलेल्या 4 खणा पैकी 2 खनातुन या घरा मागच्या परसात जाणारी बोळ अन् 2 खणातुन माडीवर जायचा जीना.... माड़ी म्हणजे 20 खणाचा समोरची बाजू एक बाजु मोकळा असलेला किमान 30 by 30 चा हॉल .... अंगनात दोन्ही बाजूने प्रत्येकी 2 पत्राच्या खोल्या....तर परसात 4 पत्राच्या खोल्या... अंगणात एका संडास बाथरूम सह वर छप्पर नसलेली नहानी ( आजची बाथरूम ) अंगणात एक रोज किमान 5 फळे लागणारे अंजिराचे झाड़ तर परसाद आमच्या घरालाच् नाही तर आजु बाजूच्या 4 वाड़याला हवा देणारे विशाल लिम्बाच झाड़... सोबतच् एक जांभाचे झाड़....या वाड़यात माझा जन्म झाला.  8 ख़ण अन् एका माडित आमचे 5 मोठे आम्ही 6 मूल असे 11 जणांचे कुटुंब.... वाड़यातल्या 8 खोल्यात 8 भाड़ेकरू ....त्यांचे भाड़े किती तर किमान 25 ते जास्तीत जास्त 60 रु महीना....

भाडेकरु ही मुलासोबतचे ..अक्ख्या वाड़यात मिळून 40 ते 50 मानस सुखैनैव नांदायचो.... उन्हाळ्यात अंगणात अन् परसात एका ओळीने तर दुपारच्या उन्हात बोळीत झोपायचो... एक नळ 40 माणसाला पानी पुरवायचा तर कधी पाणी न आल्यास वाड़यातील आडाचा आधार असायचा .... लाईट होती पण लोड शेडिंग कधी नसायची.... सकाळी 6 उठायला लागायच कारण आई - आजीला शेनान घर सारवायला लागायच.... आंगन इतके मोठे की क्रिकेट पासून ते वीटी दांडू पासून गोट्या , कोया खेळायला पुरायच.... सकाळी झाडावर जाऊन मनसोक्त अंजिर खायची .... दुपारी लींबाच्या लिम्बोल्या जमा करून त्या विकायच्या हा आमचा नित्य क्रम.... एक रेडीओ सोडता tv चे  सातवी पर्यन्त दूर दर्शनच् होते तर फ़ोन आठवीत असताना पाहायला मिळाला... पावसाळ्यातील अंघोळ म्हणजे वरुन पावसाचे पाणी अन् सोबत बकिटातले गरम पाणी.... पण सर्व एन्जॉय करायचो....याच्या बाहेर काही वेगळ अस घर असत हे माहीत असूनही ना कधी त्याची खंत वाटायची की रुखरुख ....कारण जे आहे त्यात समाधान मानायचे होते  संस्कार ..
काळानुरूप सर्व बदलल ..झाडे तूटली... हवा देण्यासाठी पंखे आले... पत्रयाच्या खोलीत राहणारे भाड़ेकरु मिळेनासे झाले.... गल्लीत 24 तास पाणी देणारा बोअर येवूनही पाणी पुरेनासे झाले.... invertor आले पण त्याच्या लाईटनेही समाधान वाटेनासे झाले... 40 माणसे राहणा-या वाडयात 6 मोठया  अन् 4 लहान माणसाला जागा कमी पडू लागली अन् आलेले पाहुणे कधी जातील असे वाटू लागले.....
बदल हा निसर्गाचा नियम आहे म्हणतात.... काळानुरूप झालेल्या बदलाला अनुसरुन आहे त्याच जागेवर नव घर बाँधताना आज या वाड़यातील एक प्रवेश द्वार सोडता  जुन्या सर्व स्मृती मोडीत काढाव्या लागल्या.... आज या विशाल जागेत साकारले आहे एक दुमलजी 6 खोल्याचे घर.. जिथे सर्व जागच्या जागी आहे... सर्व सोयी सुविधा आहेत  पण त्याही पेक्षा एक मोठे समाधान आहे अन् ते म्हणजे आम्ही याच मातीत आहोत,....याच जागी आहोत ... जिथे आहेत आमच्या लहान पणीच्या आठवणी ...अन् इथेच् झालेले संस्कार ...... जी शिदोरी आम्हाला द्यायची आमच्या कुटुंबातील मुलांना ......
- प्रशांत जोशी.
18/11/2015



Friday, May 27, 2016

मुन्न्याचा सैराट


* मुन्न्याचा सैराट *

' रात्रीस खेळ चाले' संपल्यावर तरी आपला खेळ होईल या आशेवर बसलेल्या मुन्न्याला वैतागून बायकोने खेकसुन 'रोज रोज काय..झोपा उगी " म्हणून ओरडल्याने थोडासा नाराज होत हातात मोबाईल घेउन मुन्न्या बेडवर पडला, अन आपल्या 'मैत्री...' या शाळेतल्या मित्रांच्या whats up ग्रुपवरचे मेसेज वाचू लागला....

वाचता वाचता मुन्याच्या चेह-यावरचे हावभाव बदलू लागले, नाराजीच्या जागी गालातल्या गालात हसू उमटू लागलं, त्याच कारणही तसच होत... सगळे मित्र ग्रुपवर आपण सैराटमधल्या परश्यासारखे दिसतो हि चर्चा करत आहेत हे वाचून मुन्या मनोमन सुखावला होता....

मुन्न्याच्या पेंगलेल्या डोळ्यात एक तरतरी आली अन पटकन त्याने आरशासमोर उभे राहुन स्वतःला पाहिले अन मनातल्या मनात " प्रशांतने बरोबर ओळखले हरामखोराने...माझ्या किंवा ईतरांच्या लक्षातच कसे आले नाही " म्हणत खुष होउन मागुन पुढुन आरशात बघु लागला .ईतक्यात खस्सकन एक आवाज कानावर पडला.

" झोपा ओ..लाईट बंद करा आदी...झोपु द्या जरा..सकाळी first shift आहे न..डबा करायला सकाळी पाचला उठायचय.."..मुन्न्या तातडीने लाईट बंद करुन बायको शेजारी येउन आडवा झाला..हातातल्या मोबाईल अन ग्रुप वरच्या मेसेजवरचे लक्ष काही हटेना...

ईतक्यात विशालने सैराटचा मुन्न्या अन आर्चीचा ( एडिट ) फोटो टाकला..तो बघताच मुन्न्याला काय करु कि असं झाल...बॕकग्राउंडला.."येड लागलं ..येड लागलं रं..." चालुच होत मुन्न्याच्या डोक्यात ..काय लिहाव हा विचार करेपर्यंत भस्सकन हातातला मोबाईल काढुन घेत बायको ओरडली..."झोपा मनलं नं ..". मुन्न्याने बायकोकडे पाठ केली अन झोपला...

पण आता झोपेत कोण आडवणार..स्वप्नात सैराट सुरु झाला ..सुसाट ..फक्त मुन्न्या अन आर्ची..रविची विहीर ..विहीरीवर आर्ची अन तिच्या मैत्रिणी ...अन मुन्न्या रेल्वे पटरीवरुन थर्मलला वळसा घालुन रविच्या विहिरीत उडी ...आर्ची खल्लास...लगेच ..तिच्याकडे बघत मुन्यानेच " मी आवडत नसनं तर बघु नको माझ्याकडे .." अन आर्चीसुद्धा तेवढ्याच तत्परतेने " मी कुठ म्हणल मला आवडत नाही म्हणून .." ..अन मुन्न्या अजुन उंच उंच स्लोमोशन मध्ये आर्चीसोबत मंदिराकडच्या तिर्थावर..डोंगरतुकाई..आमराई...आ हा..हा..!

ईतक्यात बायकोने जोरात धक्का मारुन ढकलले ..." झोपा म्हणले न नीट ..उगी झटु नका अंगाला..मराठीत सांगितलेल कळत नाही..ईंग्रजीत सांगु...? झोपा गप " . मुन्न्या गाढ झोपेत सैराट सुटलेला...झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट गाण्यावर फुल डांन्स..ते आर्चीच वळुन बघन..अन गाण्यानंतर चा तो कि... ..ओठावरुन जिभ फिरवत मुन्न्याचा डान्स..धुसमुसळा डांन्स.....अन मग तो क्षण ..गाडी .,गाडीत आर्ची अन मुन्न्या...मुन्न्याने आर्चीला मिठीत घेतलं ..अन आता तो क्षण..!

खळ खट्ट्याक ...मुन्न्या बेडवरुण धडपडत खाली कोसळता कोसळता सावरला..जागा झाला...अन बायको खस्सकन तार सप्तकातला स्वर लावुन ओरडली...'ऐ मुन्न्या...झोप म्हणल न ...आता माझ्या आंगाला हात लावशील तर उसात कापुन फेकीन उद्या ...झोप गप ..." !
मुन्न्या खडबडुन जागा झाला ...अरे बापरे ...हे काय...ही आर्ची..ईथ झोपनच नको ...हाॕलमध्ये जाउन झोपतो...नाहीतर रात्री आहे कापाकापी...अन पांघरूण घेउन मुन्न्या हाॕलमुध्ये सोफ्यावर ...! सकाळी सकाळी ड्युटीच्या विचारात ...पण चेहऱ्यावर गुलाबी हसु...मस्त वाटलं ...मुन्या मनातच बोलत होता.... आ हा हा ...झोप परशा ...सकाळी लवकर उठायचय..!


Monday, May 9, 2016

खंत...........!

खंत
मागच्या आठवड्यात सैराट पाहीला...अनेक गोष्टींनी मनावर परिणाम केला...पण एक खंत ..खंतच मनायला हवी..आपण सगळे शिकलो...कामाधंद्याला लागलो..कुणी डाॕक्टर..कुणी ईंजीनिअर..कुणी व्यापारी..कुणी सरकारी नौकरी...काहीजण परदेशात पण गेले..जाउन आले...पण कुणी नागराज मंजुळे नाही झाला आपल्या आसपास,  किंवा आपल्यालाही नाही होता आलं ....अवघड मार्गाने कुणी यश मिळवायचा प्रयत्न देखील नाही केला..कदाचित आपल्याला या क्षेत्रात  वा कुठल्याही creative क्षेत्रात काहीच करता येउ नये...मिळवलेल्या गोष्टींचे मोल कमी नाही...पण काही अनमोल अस आपल्याला मीळवताच येणार नाही का? कधीच नाही...ही खंत राहिलीच ना...!
आता कोणी तरी म्हणेल , जे आहोत ते काही कमी नाही. पण असं स्वतःचे समाधान करुन घ्यायची गरज नाही...सगळीकडे एकच सत्य .." बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल.." ...कर्तुत्व हे जगासमोर येउन प्रमाणीत झाल तरच त्याला मान्यता मिळते...अन्यथा कुणी कितीही ढोल बडवले तरीही त्याचा काही उपयोग नसतो...
मुद्दा यश कि अपयश हा नाही...मुद्दा प्रयत्न  ..विचार ..यांचा आहे...आपण सुशिक्षित गुर ढोर आहोत ...अस आपल्या पैकी बरेच खाजगीत बोलुन दाखवतात...खर आहे का ते?
माझ्या बोलण्यातला भाव ज्यांना समजणार नाही त्यांना कदाचित माझ्या वरिल लिहीण्याचा त्रास होईल ...पण मी खंत व्यक्त केली ती फक्त या ग्रुपवरिल सदस्यांपुर्ती सिमीत नाही..आपल्या सर्वांमध्ये कांही creative element असेल का अन असेल तर त्याचे काय..अन सिद्ध कधी होणार...! खंत ही आहे कि आपल्या पैकी कुणाचे भाषण ऐकायला लोक गर्दी करत नाहीत...वेडे होत नाहीत...आपला अभिनय पहाण्यासाठी गर्दी होत नाही..! कुणालाही साहित्य या प्रकारात रस नाही..ज्ञानपीठ कसा मिळणार..! आपल्या फोटोग्राफी..चित्रकलेचे प्रदर्शन नाही..! खेळाडू म्हणून जिल्हास्तरावर नाही...! आपण घेतलेल्या शिक्षणातुन समाजाला उपयोगी पडेल असे एखादे संशोधन नाही..एखाद्या विषयाचा विशेष अभ्यास नाही ..रांजेद्र सिंह सारखे पाणी तज्ञ .आपण लिहीलेल्या कुठल्याही पुस्तकावर ते घेण्यासाठी हॕरिपोटर सारख्या उड्या पडत नाहीत..कि आपण निर्माण केलेला अॕपल सारखा एखादा फोन घेण्यासाठी लोकांच्या रांगा लागत नाहीत . सैराटला दोन आठवडे न बोलावता वा कुठल्याही आमिषाशिवाय गर्दी आहे...हे यश एकट्या नागराज मंजुळेच कारण creative mind & its output ,,निर्भेळ यश...! असे यश हे रोजच्या जगण्याच्या गोष्टीपेंक्षा वेगळे असते ...! कुठल्याही जगविख्यात मान्यताप्राप्त पुरस्कार आपल्यासाठी नाहीच का..? का तो सुद्धा विकत मिळायला लागल्यावर घेउ...! खंत ही आहे कि आपण creative आहोत पण आपल्याला सवय नाही creativity ची...creative गोष्टींची ...ईतकच..!

©प्रशांत जोशी